बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहाद्यात आंबेडकरी अनुयायांचा भव्य मोर्चा; प्रांताधिकार्यांना निवेदन सादर.
शहादा,दि.29(का.प्र.)
बिहार राज्यातील भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या ठिकाणच्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहादा येथील बौद्ध समाजबांधव व माणसाला माणूस म्हणून मानणा-या बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रांताधिका-यांना महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचे निवेदन देण्यात आले.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हजारोंच्या संख्येने बौद्ध समाजबांधव व माणसाला माणूस म्हणून मानणा-या बहुजन समाजातील स्री-पुरुष प्रशिक बुद्ध विहार संभाजी नगर येथे जमा झाले होते.मोर्च्याच्या सुरुवातीला बोधाचारी युवराज आगळे यांनी संपूर्ण मोर्चेकऱ्यांना त्रिशरण पंचशिल ग्रहण करायला सांगितले.त्यानंतर बुद्ध पूजा झाली.बुद्ध पूजेनंतर अडिक-पडिक लोकांच्या हक्कासाठी लढणारे चळवळीचे म्होरके दादाभाई पिंपळे यांनी “साथीयो सलाम है” या क्रांतीगिताने उपस्थित मोर्चेकऱ्यांच्या अंगात ऊर्जा निर्माण केली.त्यांच्या सोबत चळवळीचे सच्चे कार्यकर्ते चुनिलाल ब्राम्हणे,प्रदीप केदारे व गणेश वळवी यांनी साथ सहयोग दिला.त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा प्रांत कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.जसजसा मोर्चा पूढे सरकला तसतशी मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत गेली.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.संभाजी नगर ,मंदाणा व पाडळदा येथील महिला बौद्ध विहार मुक्तीसाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.”महाबोधी विहार मुक्त करा”, “भारत सरकार होश मे आवो”,१९४९चा बीटीआर कायदा रद्द करा यासह सर्व महापुरुषांच्या जयघोष करणाऱ्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.निळे झेंडे, पंचशिलचे झेंडे आणि लाल झेंड्यांनी मोर्चेकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते.शेवटी प्रांताधिकारी कृष्ण कांत कनारिया यांना महिलांसह शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळेस लवकरात लवकर हिंदूंच्या ताब्यातून मुक्तता करुन महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावे व ब्राह्मण व हिंदूचा अनधिकृत कब्जा तात्काळ हटवण्यात यावा.शासनाने शांततेने होत असलेल्या आंदोलनांची दखल घेऊन शांततेत हा प्रश्न तडीस न्यावा अशी अपेक्षा संपूर्ण भारतीयांची आहे. विनाकारण बौद्धांचा अंत बघण्याचा कार्यक्रम करु नये असा इशारा सुद्धा या वेळी देण्यात आला.याप्रसंगी प्रांताधिकारी यांनी निवेदन म.राष्ट्रपतींपर्यंत पोहचवू अशी ग्वाही दिली.तद्नंतर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मोर्च्याची सांगता केली.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी छाया शिरसाठ,सोनल मोहिते,करूना बळसाणे,उषाबाई रणदिवे,रजनी बच्छाव,अलका जोंधळे,सिमा शिरसाठ,उषा खैरनार मॅडम,अलका सामुद्रे,सोनल पाटोळे,अलका बिरारे,सुशिला आगळे,उषा इशी,भारती बिऱ्हाडे या अग्रगण्य महिलांनी तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब अरविंद कुवर,काॅ.इश्वर पाटील,प्रशिकचे अध्यक्ष सुनिल शिरसाठ,दिपक मोहिते, रघुनाथ बळसाणे सर,सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ मोरे, छोटू कुंवर, सुरेंद्र कुवर ,गोटूभाऊ महिरे, दिनेश बि-हाडे, प्रदीप निकम,सुनिल पाटोळे,रतिलाल सामुद्रे,काॅ.सुनिल गायकवाड, काॅ.अनिल शिरसाठ,विष्णू जोंधळे,आबा निकुम, गजेंद्र निकुम, यादव कुवर, जितेंद्र बिरारे, विश्वास जगदेव, गौतम जगदेव,संजय बागले, सचिन पानपाटील, पितांबर बि-हाडे, मिलिंद अहिरे, साहेबराव ईशी,सुनिल बि-हाडे,ॲड.तुकाराम चित्ते,बापू घोडराज, नरेंद्र कुवर, संतोष कुवर, यांनी प्रयत्न केले.
